श्री गुरुचरित्र हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असून या अध्यायात त्यांच्या चमत्काराने त्यांच्या भक्तांचे संकट दुर करून आध्यात्मिक मार्गदर्शन सांगितले आहे. ह्या अध्यायात आपल्याला गुरूकृपेचे महत्व त्यांच्या दिव्य लीला आणि भक्ती आणि श्रद्धा यामुळे मिळणाऱ्या फळाची जाणीव होते. Gurucharitr Adhyay 14 वा खालीलप्रमाणे,

Table of Contents
||श्री गणेशाय नमः ||
|| श्री सरस्वत्ये नमः||
||श्री गुरूभ्यो नमः||
Gurucharitra Adhyay 14 श्लोक १ ते १०
नामधारक शिष्य देखा| विनवी सिद्धासी कवतुका| प्रश्न करी अतिविशेखा| एक चित्ते परियेसा ||१||
जय जया योगीश्वरा|सिद्धमुर्ति ज्ञानसागरा| पुढील चरित्र विस्तारा|ज्ञान होय आम्हासी||२||
उदरव्यथेच्या ब्रह्मणासी| प्रसन्न जाहले कृपेसी| पुढें कथा वर्तली कैसी | विस्तारावे आम्हाप्रति||३||
ऐकोनि शिष्याचे वचन| संतोष करी सिद्ध आपण |गुरुचरित्र कामधेनु जाण| सांगता जाहला विस्तारें||४||
ऐक शिष्या शिखामणि |भिक्षा केली ज्याचे भुवनीं| तयावरी संतोषोनि |प्रसन्न झाले परियेसा ||५||
गुरुभक्तीचा प्रकारू| पूर्ण जाणे तो द्विजवरु |पूजा केली विचित्रु|म्हणोनी आनंद परियेसा||६||
तया सायंदेव द्विजासी| श्री गुरु बोलती संतोषीं| भक्त हो रे वंशोवंशी| माझी प्रीति तुजवरी||७||
एकोनि श्री गुरूंचे वचन |सायंदेव विप्र करी नमन | माथा ठेऊन चरणीं|न्यासिता झाला पुनः पुन्हा||८||
जय जया जगदगुरू | त्रयमूर्तीचा अवतारू|अविद्या माया दिससी नरू| वेदां अगोचर तुझा महिमा ||९||
विश्व व्यापक तूंचि होसी| ब्रम्हा – विष्णू – व्योमकेशी| धरिला वेष तूं मानुषी| भक्तजन तारावया||१०||
Gurucharitra Adhyay 14 श्लोक ११ ते २०
तुझा महिमा वर्णावयासी | शक्ती कैंची आम्हांसी| मागेन एक आतां तुम्हांसी| ते कृपा करणें गुरुमूर्ति||११||
माझे वंशपारंपरीं | भक्ति द्यावी निर्धारीं| इह सौख्य पुत्रपौत्रीं| उपरी द्यावी सद्गति ||१२||
ऐसि विनंति करुनी| पुनरपि विनवी करुणावचनीं| सेवा करितो द्वारयवनीं | महा शूर क्रूर असे ||१३||
प्रतिसंवस्तरी ब्राह्मणासी| घात करितो जीवेसीं| याचि कारणें आम्हांसी| बोलावीतसे मज आजि||१४||
जाता तया जवळी आपण | निश्चयें घेईल माझा प्राण | भेटी जाहली तुमचे चरण | मरण कैंचें आपणासी ||१५||
संतोषोनि गुरुमूर्ति |अभयंकर आपुले हातीं |विप्रमस्तकीं ठेविती| चिंता न करी म्हणोनियां||१६||
भय सांडूनि तुवां जावें| क्रूर यवना भेटावें| संतोषोनि प्रियभावें | पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ||१७||
जंववरी तू परतोनि येसी| असों आम्ही भरंवसीं| तुंवा आलिया संतोषीं| जाऊं आम्ही येथोनि||१८||
निज भक्त आमुचा तूं होसी| परंपर वंशोवंशी| अखिलाभिष्ठ | तूं पावसी | वाढेल संतति तुझी बहुत||१९||
तुझे वंश पारंपरीं | सुखें नांदती पुत्रपौत्रीं| अखंड लक्ष्मी तयां घरीं | निरोगी होती शतायुषी||२०||
Gurucharitra Adhyay 14 श्लोक २१ ते ३०
ऐसा वर लाधोन| निघे सायंदेव ब्राम्हण| जेथें होता तो यवन| गेला त्वरीत तयाजवळी ||२१||
कालांतक यम जैसा | यवन दुष्टण पारियेसा |ब्राम्हणातें पाहतां कैसा | ज्वालारूप होता जाहला||२२||
विमुख होऊनि गृहांत| गेला यवन कोपत| विप्र जाहला भय चकित| मनीं श्री गुरूसी ध्यातसे||२३||
कोप आलिया ओळंबयासी| केवी स्पर्शे अग्निसी| श्री गुरुकृपा होय ज्यासी| काय करील क्रूर दुष्टा||२४||
गरुडाचिया पिलियांसी| सर्प तो कवणेपरी ग्रासी| तैसें तया ब्राह्मणासी| असे कृपा श्री गुरूची ||२५||
कां एखादे सिंहासी| ऐरावत केविं ग्रासी| श्री गुरुकृपा होय ज्यासी | कलीकाळाचे भय नाहीं||२६||
ज्याचे हृदयीं श्री गुरुस्मरण| त्यासी कैचें भय दारुण | काळमृत्यू न बाधे जाण| अप मृत्यू काय करी ||२७||
ज्यासि नाहीं मृत्यूचें भय | त्यासी यवन असे तो काय| श्री गुरुकृपा ज्यासी होय| यमाचें मुख्य भय नाहीं ||२८||
ऐसेपरी तो यवन| अंतःपुरांत जाऊन | सुष्यूप्ति केली भ्रमित होऊन | शरीरस्मरण त्यासी नाहीं||२९||
हृदयज्वाळा होय त्यासी | जागृत होवोनि परियेसिं | प्राणांतक व्यथेसी| कष्ठितसे तये वेळी||३०||
Gurucharitra Adhyay 14 श्लोक ३१ ते ४०
स्मरण असे नसे काहीं| म्हणे शस्त्रे मारितो घाई| छेदन करितो आवेव पाहीं | विप्र एक आपणासी||३१||
स्मरण जाहलें त्यावेळीं | धांवत गेला ब्राम्हणाजवळी| लोळतसे चरण कमळी| म्हणे स्वामी तूंचि माझा ||३२||
येथें पाचरिले कवणीं| जावे परत परतोनि| वस्त्रें भुषणें देवोनि| निरोप देतो ते वेळीं||३३||
संतोषोनि द्विजवर| आला ग्रामा वेगवक्त्र| गंगातीरी असे वासर| श्री गुरूचे चरण दर्शना||३४||
देखोनियां श्री गुरूसी| नमन करी तो भावेसीं| स्तोत्र करी बहुवसी | सांगे वृतांत आद्यंत||३५||
संतोषोनि श्री गुरुमूर्ति| तया द्विजा आश्वासिती| दक्षिण देशा जाऊं म्हणती|स्थान – स्थान तीर्थयात्रे||३६||
ऐकोनि श्री गुरूंचे वचन | विनवीतसे कर जोडून |न विसंबे आतां तुमचे चरण| आपण येईन समागमें||३७||
तुमचे चरणाविणें देखा| राहिं न शके क्षण एका| संसारसागरतारका| तूचि देखा कृपासिंधु||३८||
उद्धरावया सगरांसी| गंगा आणिली भूमीसी | तैसें स्वामी आम्हांसी| दर्शन दिधले आपुलें||३९||
भक्त वत्सल तुझी ख्याति | आम्हां सोडणें काय निति| सवें येऊं निश्चितीं| म्हणोनि चरणीं लागला||४०||
Gurucharitra Adhyay 14 श्लोक ४१ ते ४९
येणेंपरी श्री गुरूसी | विनवी विप्र भावेसीं| संतोषोनि विनयेसी| श्री गुरु म्हणती तये वेळीं||४१||
कारण असे आम्हां जाणें| तीर्थे असती दक्षिणे| पुनरपि तुम्हां दर्शन देणें| संवस्तरीं पंचदशीं ||४२||
आम्ही तुमचे गांवासमिपत| वास करूं हे निश्चित| कलत्र पुत्र इष्ठे भ्रात | मिळोनि भेटा तुम्ही आम्हां||४३||
न करा चिंता असाल सुखें| सकळ अरिष्ट्यें गेलीं दुःखें| म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें| भाक देती तये वेळीं||४४||
ऐसेपरी संतोषोनि| श्री गुरु निघाले तेथोनि| जेथें असे आरोग्यभवानी| वैजनाथ महाक्षेत्र||४५||
समस्त शिष्यांसमवेत| श्री गुरु आले तीर्थे पहात| प्रख्यात असे वैजनाथ | तेथें राहिले गुप्तरुपें||४६||
नामधारक विनवी सिद्धासी| काय कारण गुप्त व्हावयासी| होते शिष्य बहुवसी | त्यांसी कोठें ठेविलें||४७||
गंगाधराचा नंदनु| सांगे गुरुचरित्र कामधेनु| सिद्धमुनि विसरून| सांगे नामकरणीस||४८||
पूढील कथेचा विस्तारू| सांगतां विचित्र अपारू| मन करुनि एकाग्रु| ऐका श्रोते सकळिक हो||४९||
इति श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंहसरस्वत्यूपाख्याने सिद्ध – नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं – सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दश्योध्यायः ||१४||
||श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु||
||श्रीगुरुदेव दत्त||