Shree Swami Samarth Stotra
Table of Contents

Shree Swami Samarth Stotra स्तोत्र १ ते १०
ॐ श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नमः|
ॐ नमो श्री गजवदना | गणराया गौरीनंदना| विघ्नेशा भवभयहरणा| नमन माझे साष्टांगी||१||
नंतर नमिली श्री सरस्वती| जगन्माता भगवती | ब्रम्हकुमारी वीणावती| विद्यादात्री विश्वाची ||२||
नमन तैसे गुरुवर्या| सुखनिधान सद्गुरूराया| स्मरुनी त्या पवित्र पायां | चित्तशुद्धी जाहली ||३||
थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन | करुनी तयासी नमन | ग्रंथ रचना आरंभली||४||
श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पायां| स्तोत्र महात्म्य तुमचे गावया| प्रारंभ आता करतो मी ||५||
नांव गांव खुद्द स्वामींचे| किंवा त्यांच्या मातापित्याचे| कोणालाच माहित नाही साचे| अंदाज मात्र अनेक ||६||
त्यांच्या जन्मा संबंधाने, आख्यायिका लिहिली एकानें| तीच सत्य मानून प्रत्येकाने| समाधान मानावे||७||
म्हणे उत्तर भारती एका स्थानी | घनदाट कर्दळीच्या बनीं| स्वामी प्रगटले वारुळांतूनी| लाकूडतोड्याच्या निमित्ताने ||८||
कुऱ्हाडीचा घाव बसून ,त्याचा राहिला कायमचा वण| आगळी ती अवतार खुण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी||९||
एका भक्तानें केला प्रश्न,स्वामी तुमची जात कोण | तेव्हां दिले उत्तर छान | स्वामुखेंच समर्थांनी||१०||
Shree Swami Samarth Stotra स्तोत्र क्र ११ ते २०
मी यजुवेदी ब्राह्मण | माझे नांव नृसिंहभान| कश्यप गोत्र राशी मीन| ऐंसे स्वामी म्हणाले||११||
खरें खोटें देव जाणे| बरें नाही खोलांत शिरणें| ईश्वरी करणीची कारणें| आपण काय शोधावी ||१२||
दत्तात्रय तुम्ही निराकार निर्गुण | नरदेह तरीही केला धारण| सकळं भूप्रदेश केला पावन| आपुल्या चरण स्पर्शाने ||१३||
नंतर स्वामी निघाले तिथून| तीर्थ यात्रेस केले प्रयाण| दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण | प्रत्यक्ष फिरूनी पाहिलें||१४||
दत्त वास्तव्य जेथे निरंतर| तो थोर पर्वत गिरनार|तेथेच गेले अगोदर| नंतर फिरले इतरत्र||१५||
यात्रेचे प्रवास संपले | तेव्हा मंगळवेढ्यासी आले| तेथे थोडे दिवस राहिले |दामाजीच्या गांवात||१६||
काही काळ तिथे गेला | पुण्यवंतांना प्रभाव कळला| जनसमुदाय भजनीं लागला| साक्षात्कारी यतीच्या ||१७||
पुढे अक्कलकोट हें | वास्तव्याचे झाले ठिकाण | अखेरपर्यंत तिथेंच राहून | अनंत लीला दाखविल्या||१८||
तेजःपुंज शरीर गोमटें,सरळ नासिका कान मोठे | आजानुबाहू कौपुन छोटे | दिगंबर असती अनेकदां||१९||
स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे| तीन अवतार यापूर्वीचे| गुरुचरित्री वर्णिले||२०||
Shree Swami Samarth Stotra स्तोत्र क्र २१ ते ३०
पहिले दत्तात्रेय,दुसरे श्रीपाद वल्लभ | नृसिंह सरस्वती हे तिसरे नांव शुभ | गाणगापूर दर्शन देवदुर्लभ| जागृत दत्तस्थान ते ||२१||
तेथे हाउनी साक्षात्कार| पहावयासी येतो चवथा अवतार | अक्कलकोट पुण्य भूमी थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे||२२||
अक्कलकोटी नित्य राहुनी| अगाध गूढ लीला करुनी| भक्तांसी साक्षात्कार देऊनी| गुप्त झाले अनेकदा||२३||
नास्तिक होते कोणी त्यांना | चमत्कार दाखविले नाना| शेवटी कराया क्षमायाचना| लागले स्वामी चरणांसी||२४||
स्वामी सर्वसाक्षी उदार| साक्षात दत्ताचे अवतार| कधी सौम्य कधी उग्रतर| स्वरूप दाविलें दासांना||२५||
ज्यांनी त्यांची सेवा केली | त्यांची कुळे पावन झाली | जन्मोजन्मीची पापें जळली| पुण्यराशी मिळाल्या||२६||
सत्पुरुषाची करणी अगाध | वाणी गूढ निर्विवाद| झाल्याविण कृपाप्रसाद| अर्थ त्याचा समजेना||२७||
स्वामींचे बोलणे थोडें| जणू काय कठीण कोडें| अर्थ काढावे तितुके थोडे | त्यात भविष्य असे भरलेलें||२८||
जाणणारे तेच जाणिती|घेती त्यांच्या संकेताची प्रचिती| ज्याचा तोच उमजे चित्तीं| इतरां अर्थबोध होईना ||२९||
कोणाकोणाला पादुका दिधल्या|कोणाला वाहिल्या लाखोल्या| कोणाच्या मस्तकी मारिल्या | पायांतल्या वाहणाही||३०||
Shree Swami Samarth Stotra स्तोत्र ३१ ते ४०
ज्याच्या त्याच्या भाग्यप्रमाणें | स्वामींनी दिले भरपूर देणें| कोणा पुत्र कोणा सोनेनाणे | कोणा जीवदानही दिलें त्यांनी||३१||
अनेकांच्या व्याधी केल्या दूर | अनेकांना दाखविले चमत्कार| अनेकांना शिक्षा घोर | केल्या त्यांनी अनेकदा||३२||
सर्व साक्षी अंतर्ज्ञानी | पूर्णब्रम्ह ब्रह्मज्ञानी| म्हणूनच हव्या त्या ठिकाणी| दर्शन दिधलें भक्ताना ||३३||
न सांगता सर्व जाणिले| ज्याचें त्याला योग्य उत्तर दिलें| लोण्याहुनी मृदु हृदय द्रवलें| दुःखी कष्टी जीवांसाठी||३४||
दयेचा अथांग सागर | भक्तांसाठी परम उदार | अनेकांचा केला उद्धार| समुपदेश दिक्षा देऊनी||३५||
स्वामीराया दत्तात्रेया| तुमच्या कृपेचा असावी छाया| हीच प्रार्थना तुमच्या पायां|मागणे नाही आणखीं||३६||
मजवर होता कृपादृष्टी| दत्तमय भासेल सर्व सृष्टी| सुखसंपत्तीची होईल वृष्टी|सकल सिद्धी लाभती||३७||
ऐसी श्रद्धा माझे मनी| उपजली आहें आतां म्हणुनीं | मिठी घेतलीं तव चरणीं| धाव पाव समर्था तूं||३८||
तुमची करावी कैसी सेवा | हे मज ठाऊक नाही देवा| ओळखुनी माझ्या भोळ्या भावा| वरदहस्त ठेवा मस्तकीं||३९||
संसार तापें पोळलों भारी ,दूर करा ही दुःखे सारी| तुमच्यावीण माझा कैवारी| अन्य कोणी दिसेना||४०||
Shree Swami Samarth Stotra स्तोत्र क्र ४१ ते ५०
तुमचे पाय माझी काशी| पंढरपूर सर्व तीर्थे तशी| आहेत तुमच्या चरणांपाशी| मग यात्रेस जाऊ कशाला||४१||
अक्कलकोटचे समर्थ स्वामी | रंगून जातां त्यांचे नामीं| ब्रम्हा विष्णू शिवधामी| सर्व भक्ती पोंचते||४२||
स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी| त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी करीन||४३||
पाठीशीं आहे अक्कलकोट स्वामी| उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी| समर्थांच्या दासासी||४४||
भाग्यवान ते जे लागले भजनी| वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी| मान्य केली थोर योग्यता||४५||
वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला| भाविक भक्तांना दिधला| धीर अनेक संकटी||४६||
स्वामी तुमचे चरित्र आगळें| अतर्क्य अलौकिक जगावेगळे| त्यांत प्रेमाचे सागर सांठले| धन्य धन्य ज्यांना उमजलें ते||४७||
बाळाप्पा चोळप्पादि सर्वांनी| लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी| गरिबांपासून श्रीमंतांनी| सेवा केली यथाशक्ती||४८||
जे जे तुमच्या भजनीं लागले| त्याचं त्यांचे कल्याण झालें| हवें हवें ते सारे मिळाले| श्री समर्थ कृपेनें||४९||
पुढे संपल्या लीला संपले खेळ| ताटातूटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह केवळ | परब्रम्ह्यांत मिळालें||५०||
Shree Swami Samarth Stotra स्तोत्र ५१ ते ६०
शके अठराशें बहुधान्यनाम संवस्तरीं| चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी| पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी| स्वामी गेले निजधामा ||५१||
बोलता बोलता आला अंतकाळ| प्रकृतीत झाली चलबिचल| क्षणात पापण्या झाल्या अचल| निजानंदी झाले निमग्न||५२||
वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर| पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर| दिलें दर्शन भाऊसाहेबांसी||५३||
ऐसा यती दत्त दिगंबर| संपवूनी आपुला अवतार| निजधामा गेला निरंतर| भक्त झाले पोरके||५४||
बातमी जेव्हा सर्वत्र पसरली| जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली| अन्नपाणीही सुचेना||५५||
गावोगांवीची भक्तमंडळी| अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पहिली | आपल्या साश्रू नयनांनी||५६||
चवथा अवतार संपला| तरीही चैतन्यरूपें तिथेच राहिला| अक्कलकोट पुण्य भूमीला|क्षेत्रात्वा प्राप्त जाहलें||५७||
अजूनही जे येती समाधीदर्शना| त्यांच्या व्याधी आणी विवंचना| संकटे आणी दुःखे नाना| स्वामी दूर करतात||५८||
याचे असती असंख्य दाखले| अनेकांनी अनुभवले| म्हणूनी महाराजांची पाऊले| आपणही वंदूंया||५९||
नम्र होऊनी त्यांचे चरणीं| कळकळणे करुंया विनवणी| स्वामींना यावी करुणा म्हणूनी| प्रार्थना त्यांना करूंया||६०||
Shree Swami Samarth Stotra स्तोत्र क्र ६१ ते ७४
जयजया दत्ता अवधूता| अक्कलकोट स्वामी समर्था| सदगुरू दिगंबरा भगवंता| दया करी गा मजवरी||६१||
अनेकांच्या संकटी आला धावून| आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन| दूर लोटू नको मला||६२||
व्यवहारी मी जगतो जीवन| अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण| क्षमा याची असावी||६३||
सद्गुरू राया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुद्धी मजला द्यावी | पापे सर्व पळावी ||६४||
सुखाचें व्हावे जीवन ऐहिक| धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्र सुख | गृहसौख्य आणी वाहनसुख| अंती सदगति लाभावी||६५||
तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा| म्हणुनि याचना करतों देवा| उदार मनाने वर द्यावा| आणी तथास्तु म्हणावे||६६||
तुमची होता कृपा पूर्ण | जीवन माझे होईल धन्य | म्हणूनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना||६७||
मी एक मानव सामान्य| तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथींचे करितों वाचन| दान द्या तुमच्या कृपेचे||६८||
वेडीवाकुडी माझी सेवा| स्वीकारावी स्वामी देवा| वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती||६९||
शके अठराशे न व्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी| शुभ रामनवमी दिवशी| पोथी पूर्ण झाली ही||७०||
स्वामींचे चित्र ठेऊनी पिढ्यांत| किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत| बसुनी ही पोथी वाचावी मनांत| इच्छा सफल होईल ||७१||
माणिकप्रभू, साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोटचे दिगंबर| एकाच तत्वाचे तीन अविष्कार|भेद त्यांत नसे मुळी||७२||
एकाचीं करिता भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती| पोथी नित्य वाचावी||७३||
या पोथीचे करितां नित्य पठण| प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण | सत्य सत्य वाचा ही ||७४||
ॐ श्री अक्कलकोट स्वामी समर्थापर्णमस्तू || शुभं भवतु||ॐ शांति: शांति: शांति:||
||”श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र — महात्म्य संपूर्ण”||
